विरोध करणाऱ्यांना आम्ही रिफायनरीचे महत्व समजावून सांगू.-मंत्री उदय सामंत

रत्नागिरी :आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची जी भूमिका घेतलेली आहे. त्यांच्यासाठी कोणाच्याही शिफारसीची आवश्यकता नाही. त्यांचे संरक्षण वाढवण्यात आलेलं आहे. अजूनही संरक्षणात वाढ करायची असेल तर चिंता नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सूचना करेन, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते सोमवारी रत्नागिरी बोलत होते. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतलेली आहे. बेरोजगारांना जर रोजगार द्यायचा असेल, तर रिफायनरी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. नाहीतर आपण फक्त बेरोजगारीचे कारखाने तयार करू, ही सर्व भूमिका आम्ही शेतकऱ्यांना पटवून देऊ, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच राजापूरमध्ये जे काही टेस्टिंग चालू आहे. त्यासाठी काही लोकांनी परमिशन दिलेली आहे. काहीनी परमिशन दिलेली नाही. ज्यांनी परमिशन दिली नाही त्यांची आम्ही समजूत काढू, ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे देखील पटवून देऊ असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच प्रकल्प विरोध मोडून काढणं, ही वेगळ्या कोणाची तरी स्टाईल असेल, आमची ती स्टाईल नाही. विरोध करणाऱ्यांना आम्ही रिफायनरीचे महत्व समजावून सांगू. इथला परिसर कसा सुजलाम सुफलाम होईल, हे समजून सांगू आणि ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे देखील पटवून देऊ. त्यामुळे विरोध मोडून काढण्याचा काही प्रश्नच येत नाही, असे मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. तसेच नाटे येथे क्रूड टर्मिनससाठी 500 एकर जमीन घेणार आहोत. त्या सर्व जमिनीची संमती पत्र मिळालेली आहेत. काही लोक गैरसमज पसरवत आहेत. तसेच 2900 एकर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आलेली आहे. तसेच राजन साळवी यांनी जे जनतेचे प्रश्न मांडलेले आहेत. ते पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.