लॉकडाऊनच्या संभ्रमावस्थेमुळे कोकणातील व्यापारी संतप्त;प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले…
खेड,दि.५:कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहिर केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाची अमंलबजावणी सुरु होताच संभ्रमावस्थेत गेलेल्या खेडमधील व्यापारी वर्गात संताप पसरला असून दुकाने बंद करण्यासाठी प्रशासनाने पोलीसी बळाचाही वापर केल्याने चिडलेल्या व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्यासाठी गेलेल्या प्रशासकिय अधिकाऱ्यांशी वादावादी करत दुकाने बंद केली तर आमच्या नोकरांचा पगार कोण देणार असे प्रतिप्रश्न उपस्थित केले. त्यामुळे खेड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खेड तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ या दरम्यान कडक लॉकडाऊन घोषीत केले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाला व्यापाऱ्यांचीही संमत्ती होती मात्र आज अचानक सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास खेडच्या प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने, तहसिलदार श्रीमती प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरिक्षक श्रीमती निशा जाधव, खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खेड बाजारपेठेत जावून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सुरवात केली.
राज्य शासनाच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने दुकाने बंद करण्यास सुरवात केल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवल्यानंतर प्रशासनाने पोलिसांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामुळे शहरातील व्यावसायिक आणखीनच संतप्त झाले. “दुकाने बंद ठेवायला सांगत असाल तर आमच्या दुकानांची आणि घराची विजेची बिले, दुकानात काम करणाऱ्या कामगारांचा पगार, दुकानाचे भाडे,व्यापाऱ्यांची देणी द्यायची” असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवला.त्यानंतर सर्व व्यापारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची नगरपालिका हॉलमध्ये बैठक झाली, या बैठकीला सुमारे २०० हून अधिक व्यापारी उपस्थित होते. या व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसिलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरिक्षक निशा जाधव आणि मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना घेराव घालत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी प्रातांधिकारी सोनोने यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत आम्ही केवळ शासनाच्या आदेशाचे पालन करत आहोत असे सांगितले. मात्र व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हॉटेल व्यवसायिकानी तयार केलेल्या मालाचे करायचे काय? हा प्रश्न हॉटेल व्यवसायिकांनी उपस्थित केला. मात्र या प्रश्नाचे उत्तर प्रशासकिय अधिका कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे ही काळाची गरज असली तरी तरी ज्या पद्धतीने लॉकडाऊन लादला जात आहे ते आम्हाला मान्य नाही, कोरोनाच्या नावाखाली गेले अनेक महिने बंद असलेला व्यवसाय आता कुठे सुरु झाला झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा व्यवसाय बंद करणे आम्हाला परवडणारे नसल्याने आम्ही दुकाने बंद ठेवणार नाही व्यावसायिकांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांची अडचण झाली. रत्नागिरीसह लगत च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या दुकानदारांनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.