मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर कदाचित थोड्या प्रमाणात निर्बंध लावण्यावर निर्णय होऊ शकेल -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई- गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत होणारी वाढ पाहता आता राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘काल महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना बाधितांची एकूण संख्या ११४९२ इतकी होती आणि आज ही संख्या २९ हजारावर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत १३०० सक्रिय रुग्ण आहेत. आज संध्याकाळी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आपल्या येथे जर निर्बंधांचे पालन केले नाही आणि सहजासहजी सर्व गोष्टी घेतल्या, तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आपल्याला करावेच लागेल. निर्बंध लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे निर्णय घेईल. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल आणि कदाचित थोड्या प्रमाणात निर्बंध लावण्यावर निर्णय होऊ शकेल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.