मुंबई

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल, आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री 

मुंबई – बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थिनीना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत घडलेल्या घटनेबद्दलचे अपडेट्स:-

• बदलापूर (पूर्व) येथील एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.

• पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.

• संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेश.

• संतप्त जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले आहे. तुरळक दगडफेकही झाली आहे.
लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असे जाहीर करुन जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश दिले आहेत.

• सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देश दिले आहे.

• झालेल्या मन:स्तापाबद्दल संस्थेने माफी मागितली आहे.

• कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

• जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे स्वतः संपूर्ण घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!