रत्नागिरी,दि.५ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हॉटसॲप व्दारे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश व्हायरल झालेला होता. ज्यात रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,संचालक, मुंबई येथे आणि जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर श्री. अर्जुन संकपाळ, भा प्र.से. यांची
आंतरराज्य प्रतिनियुक्तीने शासनाकडे रुजु झाल्याने बदली झाल्याचे दर्शविण्यात आले होते.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती के मंजुलक्ष्मी यांची आंतरराज्य बदली झाल्याचा जी आर(शासकीय आदेश) तयार करण्यात आला होता.
सदर बातमी रत्नागिरी सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातही व्हायरल झालेली होती. सदरची बातमी व्हायरल होताच जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या बातमीची दखल घेत, सदरची बातमी खोटी असल्याचे आणि त्यांची बदली झाली नसल्याचे सांगितले होते.या घडामोडींची दखल घेत पोलीस अधीक्षक, डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर प्रकरणाची उपयुक्त माहिती देवुन, आरोपीचा शोध घेण्याचे मार्गदर्शन करुन आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार केली. या पथकामध्ये पोहवा/सुभाष भागणे, मिलींद कदम, शांताराम झोरे, संदीप कोळंबेकर, प्रशांत बोरकर, संजय जाधव, पोना/अमोल भोसले, बाळु पालकर, विजय आंबेकर रमिज शेख यांचा समावेश होता.सदर पथकाने ओणी येथील शेरलीन मोन्टा रिसॉर्ट या रिसॉर्टमध्ये मध्यरात्री शोध घेतला.त्यावेळी तेथे सदर रिसॉर्टचे मालक अविनाश अनंतराव पाटील व अन्य यांचेकडे चौकशी केली. त्यानंतर केलेल्या कार्यवाहीत यातील संशयित अर्जुन संकपाळ हा त्यांच्या पत्नी व इतर कुटुंबियासह मिळुन आला.त्यावेळी केलेल्या अधिक चौकशी नंतर दि. ०३/०५/२०२१ रोजी अर्जुन संकपाळ हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली यातील अर्जुन संकपाळ यांचेकडे कसुन चौकशी केली असता, ते भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी नसल्याचे त्याने मान्य केले.दरम्यान सदर घटने अनुषंगाने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याचे तक्रारीवरुन गु.नों क्र. १३७/२०२१, भादस ४६५,४६९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.त्यानंतर चौकशीअंती अर्जुन संकपाळ याने गुन्हा कबुल केल्याने त्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडुन अर्जुन संकपाळ यास अटक करण्यात आली.
सदरचा आरोपी हा राहणार कुपवडे ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील राहणारा आहे. काल दि. ०४/०५/२०२१ रोजी आरोपी अर्जुन संकपाळ यास न्यायालयासमोर हजर केले असता त्याची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.