कोरोना परिस्थिती नियंत्रणात असलेल्या भागांत व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातल्यानंतर आता राज्यातील काही जिल्हे वगळता इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. एक तर हे निर्बंध पूर्णतः काढून पूर्ण दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी म्हटलं आहे.
जून महिन्यापासून पंचस्तरीय रचना करून ज्या जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला आहे तेथील उद्योग धंदे व व्यापार उदीम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र तीनच आठवड्यात सरकारनं मूळ धोरणावरून घुमजाव करत पुन्हा निर्बंध लागू केले. शहरांमध्ये तेव्हा नुकतेच सुरु होत असलेले मॉल्स आणि थिएटर्स पुन्हा बंद झाले. रात्रीपर्यंत सुरू असणारी दुकानं दुपारी ४ वाजता बंद करण्याचे निर्बंध लागू झाले. त्यामुळे सरकारवर व्यापारी वर्गातून मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे चित्र आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, त्या भागात निर्बंध जाहीर करावेत, मात्र जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी आणि निर्बंध काढून टाकण्यात यावेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ही बाब मान्य केली असून यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असं टोपे यांनी म्हटलं आहे.