सांगलीच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम कुटुंबाचा पुढाकार ; अस्लमभाईंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!

मुंबई : सांगली, विजयनगर येथील अस्लम गुलाब शिकलगार (६०) यांना उपचारा दरम्यान डॉ, आवळेकर यांनी मेंदूमृत (ब्रेनडेड) घोषित केले. त्यानंतर त्यांचे भाऊ सुरज गुलाब आणि पत्नी शबाना तौफिक यांना भारती हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. आवळेकर यांनी अवयव दानाचे महत्व पटवून दिल्यानंतर कुटुंबियांनी दोन किडनी आणि नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. हे अवयव मिरजेतील भारती हॉस्पिटल येथे दान करण्यात आले. सांगलीच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम धर्मीय कुटुंबाने घेतलेला हा अवयवदानाचा निर्णय, केवळ ऐतिहासिकच नाही तर सामाजिक एकात्मतेचा आणि माणुसकीचा अमूल्य संदेश देणारा ठरतो.
या मानवतेच्या कार्याची दखल घेत बॉडी ऑर्गन फेडरेशन अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी “इन्सानियत की मिसाल के लिये दुवाये” हा विशेष संदेश तर माणुसकीच्या धर्माला समर्पित केलेली एक अमोल भेट आहे. अशा कार्यासाठी समाजाने एकत्र येऊन अधिकाधिक प्रेरणा घेणे हीच खरी मानवसेवा ठरेल, असा संदेश दिला. अवयवदानासंदर्भात विविध समाजाबाबत असलेल्या अनेक अपसमजांना छेद देणारा हा निर्णय, केवळ एका कुटुंबाचा धाडसी निर्णय नाही, तर संपूर्ण समाजाला दिशा दाखविणारा आदर्श ठरला आहे. धर्म, जात, पंथ यांच्या पलिकडे जाऊन घेतलेल्या या निर्णयाने समाजातील रूढ कल्पना मोडून टाकल्या आहेत आणि एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या अवयवदाना नंतर अब्दुल भाई यांचा पार्थिव देह कुटूंबाकडे पुढील विधिसाठी सुपूर्द करण्यासाठी रुग्णवाहिका व ZTCC च्या आरती गोखले आणि डॉ. हेमा चोधरी यांनी मोलाची कामगिरी बजावली. ‘प्रेम आणि माणुसकीला कोणताही धर्म नसतो’ या विचाराला मूर्त रूप देणारा हा निर्णय समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. अस्लमभाईंच्या या अवयवदानामुळे अनेक गरजूंना नवसंजीवनी मिळाली. त्यांच्या कुटुंबाच्या धाडसी आणि उदात्त निर्णयाबद्दल समाजातील सर्व थरातील लोकांकडून कौतुक होत आहे. दान प्रक्रियेत सांगली जिल्हा समन्वयक डॉ. हेमा चौधरी यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी युवराज मगदूम, अस्लमभाईंचे कुटुंबिय उपस्थित होते. मृत्यूनंतरही माणुसकी जपणाऱ्या अस्लमभाईंच्या कार्याला सलाम, असल्याची प्रतिक्रिया अवयवदानाचे क्रीयाशील कार्यकर्ते, पर्व फौंडेशनचे प्रमुख प्रवीण वराडकर यांनी व्यक्त केली.