मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी; सुट्टी रद्द करून हायकोर्ट उघडलं, मोठा निर्णय येणार?

मुंबई; मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. आंदोलकांनी हजारो गाड्या मुंबईत आणल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाला आज सुट्टी असताना देखील सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सदर सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलाना विरोधात सदावर्ते यांनी देखील याचिका दाखल केली होती.
सुट्टी रद्द करुन हायकोर्ट उघडलं, मोठा निर्णय येणार?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. परंतु मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्य केले आहे. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत केलं होतं. तसेच आझाद मैदानात आंदोलनासाछी 5 हजार लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.