कोंकण

गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल

रत्नागिरी – कोकणवासीयांच्या प्रमुख सण असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. कोकण रेल्वेच्या विशेष आणि नियमित गाड्या खचाखच भरून येत असून खासगी वाहने, बसेस तसेच एसटी गाड्यांमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कमालीची वाहतूक कोंडी होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. महामार्गवरील धामणी पेट्रोल पंपापासून थेट संगमेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळित करण्यासाठी संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक अमित यादव स्वतः रस्त्यावर उतरले होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मुंबई-गोवा महामार्ग गणेशभक्तांच्या वाहनांमुळे फुलून गेला आहे. हजारो वाहने रस्त्यावर आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले असून वाहतूक सुरळित होण्यासाठी स्थानिक पोलीस मदत करीत आहेत.

कोकण रेल्वेनेही नियमित गाड्यांच्या बरोबरीने मुंबई, पुणे तसेच गुजरातमधून जादा गाड्या सोडल्या आहेत. आज आणि उद्या (दि. ६ आणि ७ सप्टेंबर) सर्वाधिक गाड्या या मार्गावर धावत आहेत. या सर्व गाड्यांमधून आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटांवर लक्षावधी प्रवासी कोकणात दाखल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!