नवी दिल्ली

शाश्वत विकास उद्दिष्टांच्या राष्ट्रीय स्तरावरील पूर्ततेसाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे -ॲड. राहुल नार्वेकर

• उद्योग, तंत्रज्ञान आणि कृषी या क्षेत्रांचा विकासासाठीचा एकात्मिक दृष्टीकोन
• पर्यावरण रक्षणासाठी सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन 
नवी दिल्ली – शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्रम-२०३० संदर्भात केंद्र सरकारच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्र सरकारची देखील तितकीच बांधिलकी आणि योगदान असुन उद्योग, तंत्रज्ञान आणि कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठीचा एकात्मिक दृष्टीकोन स्विकारण्यात आला आहे. शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती बरोबरच भारताला अखिल विश्वातील समृध्द आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्वाचे ठरत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाच्या (CPA India Region) १० व्या परिषदेत ते बोलत होते. दिनांक  २३ व २४ सप्टेंबर, २०२४ रोजी नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद “शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित आहेत. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यसभेचे उप सभापती हरिवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन दिवसीय परिषदेस प्रारंभ झाला. परिषदेतील चर्चासत्रात अॅड. राहुल नार्वेकर यांनी आपले विचार मांडले.
पर्यावरण रक्षणासाठी सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन, समृध्दी महामार्गालगत बांबू लागवड, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरणाचा वेग असलेले राज्य लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीचे विस्तारते जाळे, इलेक्ट्रिक वाहने, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प या मुद्यांकडे विधानसभा अध्यक्ष ॲड.  राहुल नार्वेकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे लक्ष वेधले. विधानमंडळ म्हणून विचार करता केवळ आर्थिक विकास हेच एकमेव मानक स्वीकारून चालणार नाही तर सर्वसमावेशक विकासाची फळे सर्वांपर्यत पोहचणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वांची भूमिका असणे, पायाभूत सोयीसुविधांचा वापर सर्वांना करता येणे, शहरांबरोबरच ग्रामीण विभागात वाढत्या रोजगार संधी निर्माण करणे या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्या दिनांक २४ सप्टेंबर रोजी या दोन दिवसीय परिषदेचा समारोप होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!