तो अग्रलेख सामनाच्या वेबसाईटवरून का हटवण्यात आला?मनसे नेते संदीप देशपांडे यांचा सवाल

मुंबई- राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोधकांकडून विरोध होत असताना आता मनसेने देखील या निर्णयावरून राज्य सरकारवर टिकास्त्र डागलं आहे. राज्यात कोरोनाच्या काळात वाईन शॉप सुरू करावे, अशा सूचना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला दिल्या होत्या. तेव्हा संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून राज ठाकरे यांच्या सूचनेची खिल्ली उडवली होती.
आता राज्य सरकारने वाईन सुपर मार्केटमध्ये विकण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर तो अग्रलेख सामनाच्या वेबसाईटवरून का हटवण्यात आला? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.राज्य सरकारने नुकताच राज्याचा महसूल वाढवण्यासाठी वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, या निर्णयावर मनसेने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे का? तेव्हा राज ठाकरेंवर टीका करणारा अग्रलेख सामनाच्या वेबसाईटवरून का हटवण्यात आला? कंपन्यांचे शेअर विकत घेतले म्हणून सुबुद्धी सूचली का? असे सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले.