महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका हात जोडून विनंती करतो- जितेंद्र आव्हाड
राज ठाकरेंच्या सभेतील भाषणावर दिली प्रतिक्रिया

मुंबई: गुढी पाडव्या च्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषांवर महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे केली.
आज राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी वरील विनंती केली.महाराष्ट्र शांत आहे… कुठेही क्लेश नाही… द्वेष दिसत नाही… सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहेत असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय… त्यांच्या खिशात पैसे नाहीयत… गॅस महाग झालाय… पेट्रोल – डिझेल महागलंय… भाज्या… केरोसिन महाग झालंय… खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झालंय याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचं नाही ते इश्यू बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.
गॅसबद्दल… पेट्रोल – डिझेल… महागाई याबद्दल बोला ना… ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला… श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका असा स्पष्ट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.