क्राइम

NIA ची मोठी कारवाई, अँटिलिया स्फोटकं प्रकरणी दोघांना अटक!

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी NIA नं मुंबईतूनच अजून दोघांना अटक केली आहे. संतोष शेलार आणि आनंद जाधव अशी या दोघांची नावं आहेत. न्यायालयानं या दोघांची २१ जूनपर्यंत एनआयएच्या कोठडीत रवानगी केली आहे. अँटिलियाबाहेर एनआयएनं या दोघांना स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएनं मुंबईतल्या मालाड परिसरातून अटक केली आहे.

या प्रकरणाचा एनआयए तपास करत असून आत्तापर्यंत तीन पोलीस अधिकारी आणि एक हवालदार या प्रकरणात निलंबित झाले आहेत. २५ फेब्रुवारी रोजी अँटिलियाबाहेर पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. यानंतर काही दिवसांतच या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची देखील हत्या झाली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणात मुंबई पोलिसांतील निलंबित पोलीस सहनिरीक्षक सचिन वाझे हे प्रमुख आरोपी आहेत.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही सहभाग?

दरम्यान, या प्रकरणी मोठी कारवाई करत एनआयएनं मुंबईच्या मालाड परिसरातून अजून दोघांना अटक केली आहे. ११ जून रोजी एनआयएनं ही कारवाई केली असून प्राथमिक माहितीवरून या दोघांचा अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्याच्या कटामध्ये सहभाग असल्याचं दिसून येत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय, मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटामध्ये देखील या दोघांचा हात होता किंवा नाही, याचा तपास देखील एनआयए करत आहे.

 काय आहे प्रकरण?

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. त्यानंतर ५ मार्चला ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि तपासाअंती अनेक खुलासे होत गेले. हा संपूर्ण कट सचिन वाझे याने रचल्याचं उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ त्याला मदत करणाऱ्या रियाज काझी या पोलीस अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!