मुंबई

पटोले-राऊत काल आमने-सामने, आज वाद मिटवत एकत्र

मुंबई – विधानसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडीत जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. यावरून नाना पटोले आणि संजय राऊत हे काल, शुक्रवारी आमने-सामने आले होते. मात्र, त्यानंतर आज, शनिवारी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भातील एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पटोले आणि राऊत हे दोघे एकत्र दिसले. त्यामुळे दोघांतील वाद मिटल्याचं बोललं जात आहे.

पटोले यांच्यावर राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली होती. परंतु, यावर आता पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राऊत यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे आता हा वाद संपला आहे, असे पटोले यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात १० हजार मतांची फेरफार सुरु असून या षडयंत्राचे प्रमुख भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच वेळ पडल्यास आम्ही निवडणूक आयोगावर मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशाराही यावेळी राऊत यांनी दिला. तर महाराष्ट्रातील मतदारांची नावे कट करून दुसऱ्या राज्यातील लोकांची नावे जोडण्यात येत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

पटोले आधी म्हणाले होते की, संजय राऊत यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत. आमचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी आहेत.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आहेत. त्यामुळे आम्हालाही आमच्या नेत्यांशी बोलावे लागते. आमच्या नेत्यांसाठी वास्तविकता ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते करत आहोत, संजय राऊत काय करतात, यावर आम्ही काहीही बोलू इच्छित नाही, असेही पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!