उड्डाण क्षेत्रात महिलांना समान संधी मिळणे महत्वाचे – राष्ट्रपती

नवी दिल्ली : भारत सरकारच्या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीला पाठबळ मिळाले आहे. अधिकाधिक महिला करियरसाठी आता विमान वाहतूक क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. उड्डाण क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या सहभागासोबतच त्यांना समान संधी मिळणे हे देखील महत्वाचे असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. राष्ट्रपती भवनात आज (4 नोव्हेंबर) भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील यशस्वी महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जनतेबरोबर दृढ संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करणे हा उद्देश असेलल्या “द प्रेसिडेंट विथ द पीपल” या उपक्रमाअंतर्गत ही भेट झाली.
भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात महिला विविध परिचालन व तांत्रिक बाबतीत महत्वाची भूमिका बजावत आहेत, असे राष्ट्रपती या प्रसंगी म्हणाल्या. हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) जबाबदारी पार पाडणाऱ्या 15 टक्के महिला आहेत, तर 11 टक्के फ्लाईट डिस्पॅचर्स व 9 टक्के एरोस्पेस इंजिनिअर्स या महिला आहेत असे निरीक्षण राष्ट्रपतींनी नोंदवले. गेल्या वर्षी वाणिज्यिक उड्डाण परवाने मिळालेल्या वैमानिकांपैकी 18 टक्के महिला असल्याचं त्यांनी सांगितलं. नवनवीन वाटा चोखाळण्याचे धैर्य दाखवणाऱ्या व नवीन कल्पना राबवणाऱ्या या यशस्वी महिलांचे त्यांनी कौतुक केले.
योग्य शिक्षण व प्रशिक्षणासोबत कुटुंबाचा पाठिंबा देखील आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. अनेक उच्चशिक्षित महिला केवळ कुटुंबाचा पाठिंबा नसल्यामुळे करियरची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत असे दिसून येते. त्यांनी या यशस्वी महिलांना इतर महिलांना करियरची निवड तसेच प्रगतीसाठी मार्गदर्शन करून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.