१७ ऑगस्ट पासून शाळा होणार सुरु: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
कोविड निर्बंध शिथील केलेल्या क्षेत्रात देणार परवानगी
मुंबई । ज्या जिल्ह्यामध्ये कोरोना निर्बंध शिथील केले आहेत, तेथे शाळांचे वर्ग १७ ऑगस्ट पासून भरवण्याचा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण संसर्ग दर कमी आहे, तेथे कोरोना निर्बंध शिथील केले आहेत, अशा जिल्ह्यांत ५ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथील केलेले असतील तेथे ८ ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरण्यात येणार आहेत.
ज्या गावांत कोरोना रुग्ण नाहीत, अशा गावात ८ ते १२ वीचे वर्ग जून २०२१ पासून सुरु करण्यात आलेले आहेत. त्याला प्रतिसाद चांगला आहे. २२ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यानंतर ५ ते ७ वी पर्यंतचे वर्ग काही महिन्यात चालु केले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यावर ते वर्ग बंद करण्यात आले होते.
महाविद्यालयांचे विद्यार्थी कोरोना प्रोटोकाल पाळण्यास सक्षम असतात, मात्र महाविद्यालयांचे वर्ग बंद असताना प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग चालु करण्यात येत असल्याबाबत शिक्षण क्षेत्रातूनच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.





