खासदार रवींद्र वायकर यांच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांची मोठी माहिती; मुंबईत ३३ हजार कोटींचे प्रकल्प आणि ३४ स्थानकांचा होणार विस्तार!

नवी दिल्ली/मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुंबईत प्रवाशांची क्षमता वाढवण्यासाठी १५ डब्यांच्या गाड्या सोडण्याचे नियोजन असून, त्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांची लांबी वाढवण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वायकर यांनी मांडला रेल्वे अपघातांचा गंभीर प्रश्न
लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खासदार रवींद्र वायकर यांनी मुंबई लोकलमध्ये होणारी गर्दी आणि अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी सभागृहात आकडेवारी मांडताना सांगितले की, २०१५ ते मे २०२५ या काळात २६,५४७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून दररोज सरासरी ६ प्रवासी आपला जीव गमावत आहेत. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय ‘डबलडेकर’ गाड्या सुरू करणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
रेल्वेमंत्र्यांची उत्तरातील प्रमुख घोषणा:
• स्वयंचलित दरवाजे (Automatic Doors): प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी २३८ उपनगरीय गाड्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्याचे काम सुरू आहे.
• स्थानक विस्तार: १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी ३४ महत्त्वाच्या स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवली जात आहे.
• नवीन प्रकल्प: वांद्रे, मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, दादर, वसई, परेल, विरार, डहाणू, मीरा रोड, पनवेल, कल्याण आणि एलटीटी रेल्वे स्थानकांजवळ अतिरिक्त रेल्वे मार्ग आणि विकासाची कामे सुरू आहेत.
• एम.यु.टी.पी (MUTP): मुंबईत सध्या ३३ हजार कोटींचे विविध प्रकल्प कार्यान्वित आहेत.
कोकण रेल्वे दुपदरीकरण: राज्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा
वायकर यांनी विचारलेल्या कोकण रेल्वेच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, दुपदरीकरणाचा डीपीआर (DPR) तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात चार राज्यांची गुंतवणूक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांची मंजुरी मिळाली असून, आता कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.



