मुंबई,दि.११: देशात कोरोना वरील लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे. महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. मात्र, लशींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पूर्णपणे थांबवीले जाण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे.
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. पण, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं कोव्हॅक्सिन आहे, ते आज साधारपणे पावणेतीन लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले ३५ हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
“१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी आलेले लसीचे डोस ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशी सूचना महाराष्ट्रातील सर्व लसीकरण केंद्रांना देण्यात आली आहे. केवळ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस राहिला आहे, असं नाही. तर कोविशिल्डचे सुद्धा १६ लाख डोस केंद्राकडून यायचे राहिलेले आहेत. त्यामुळे राज्याने खरेदी केलेली लस केंद्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरावी लागत आहे.दरम्यान १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही दिवसांसाठी थांबवावे लागणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.. या बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले