महात्मा फुले वाडा भाडेतत्त्वावर देण्याच्या मागणीचा जिजाऊ ब्रिगेड रत्नागिरीकडून तीव्र निषेध….
सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या मागणीवर जिजाऊ ब्रिगेडने उपस्थित केले आक्षेप; ऐतिहासिक वारसा जपण्याची मागणी

मुंबई: महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील ज्या ऐतिहासिक वाड्यातून सत्यशोधक चळवळ उभी राहिली, तो फुले वाडा भाडेतत्त्वावर (Lease) देण्याच्या एका मागणीचा रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडने तीव्र निषेध केला आहे. फुले वाडा ही केवळ वास्तू नसून महाराष्ट्राचा ऐतिहासिक व सामाजिक वारसा आहे; त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत भाड्याने देण्याचा विचार शासनाने करू नये, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
फुले वाडा भाड्याने देण्याची मागणी एका सार्वजनिक विश्वस्त संस्थेने केली आहे. या मागणीवर आक्षेप घेत जिजाऊ ब्रिगेडच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा अस्मिता भालेकर यांनी म्हटले आहे की, फुले दाम्पत्याने या वाड्यातून स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि सत्यशोधक समाज यांसारख्या क्रांतिकारी चळवळींना सुरुवात केली. या वाड्याचा उपयोग केवळ सामाजिक कार्यासाठीच झाला पाहिजे.
जिजाऊ ब्रिगेडने शासनाला आवाहन केले आहे की, फुले वाड्याचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन तो राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करावा. जर शासनाने हा वाडा भाडेतत्त्वावर देण्याचा विचार केला, तर त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिजाऊ ब्रिगेडने दिला आहे.
सामाजिक वारसा जपण्याचे आवाहन:
हा वाडा भाड्याने देण्याऐवजी, त्याचे पावित्र्य राखून तो महाराष्ट्रातील नव्या पिढीला प्रेरणा देणारे केंद्र म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. फुले वाड्याच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपला जावा, अशी भूमिका जिजाऊ ब्रिगेडने घेतली आहे.






