वाटद एमआयडीसीबाबत 26 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक; पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद एमआयडीसी येथे धीरूभाई अंबानी डिफेन्ससह अन्य प्रदूषणमुक्त उद्योग येणार आहेत. पण वाटदमध्ये विरोध करणाऱ्या काही लोकांना यातून स्वहित साधायचे आहे. त्यामुळे एमआयडीसी समर्थक स्थानिक व शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या २६ जुलैच्या सभेला आपण जाणार आहोत. यावेळी विरोधकांनी आपल्याकडे केलेल्या मागण्या पुराव्यानिशी मांडणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना विश्वासात घेवूनच सर्व निर्णय घेतले जातील आणि त्यांच्यावर अन्याय होवू दिला जाणार नसल्याचेही ते म्हणाले. येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. प्रस्तावित वाटद प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी आपणास किती वेळा भेटून काय मागण्या केल्या होत्या, हे अजून आपण शेतकऱ्यांना सांगितले नसल्याचे सामंत म्हणाले. वाटद एमआयडीसी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. एमआयडीसी समर्थकांची एक सभा २६ जुलै रोजी सायंकाळ ५ वाजता वाटद येथे आयोजित करण्यात आली आहे.