महाराष्ट्रमुंबई

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक..

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात कांजूरमार्ग येथील  खेळाडू कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. या कामगिरीबद्दल क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सेरेनासह भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.

१९ ते २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील कांजूरमार्ग येथील स्वराज्य स्पोर्ट्स क्लबची खेळाडू कुमारी सेरेना म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. मुले आणि मुली या दोन्ही भारतीय संघाने या स्पर्धेत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावून देशाचा मान उंचावला.

या उत्कृष्ट यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी कुमारी सेरेना म्हसकर हिचे तसेच प्रशिक्षक, पालक व स्वराज्य स्पोर्ट्स क्लबच्या व्यवस्थापनाचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी ही राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे.  शासनाकडून अशा प्रतिभावंत खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”

सेरेनाच्या या यशामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून क्रीडाक्षेत्रातील नवोदितांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

अंतिम फेरीत, दोन्ही भारतीय संघ इराणविरुद्ध आमनेसामने आले, परंतू सामने अगदी वेगळ्या शैलीत झाले. मुलांच्या संघाने कठीण संघर्षाचा सामना केला आणि शेवटी ३५-३२ अशा गुणांसह इराणवर विजय मिळवला. याउलट, मुलींच्या संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत इराणचा ७५-२१ असा जबरदस्त पराभव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!