महाराष्ट्र

डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय ‘एसआयटी’ चौकशीची मागणी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे निर्माण झालेल्या संतापजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज (४ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय विशेष चौकशी समिती (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या भेटीदरम्यान पीडितेचे आई-वडील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यादेखील उपस्थित होत्या.

आत्महत्या नसून खुनाचा संशय:

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणातील गंभीर विसंगती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ आत्महत्या नसून खून असण्याची शक्यता आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम ८५ (तत्कालीन आयपीसी कलम ४९८अ) अंतर्गत छळ आणि मानसिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. या तपासावर कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चौकशी आणि संरक्षणाची मागणी:

डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
* एसआयटी नियुक्ती: या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी, महिला संवेदनशील संस्था, मनोवैज्ञानिक आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र उच्चस्तरीय विशेष चौकशी समिती (एसआयटी) तातडीने नियुक्त करावी.
* महिला आयपीएस अधिकारी: तपासाची देखरेख एका महिला आयपीएस अधिकारी यांनी करावी.
* कालबद्ध तपास: प्रकरणाचा प्राथमिक अहवाल तीस दिवसांत आणि अंतिम अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेत.

* कुटुंबीयांचे संरक्षण: पीडित कुटुंबावर कोणताही दबाव येऊ नये यासाठी विशेष संरक्षण, कायदेशीर मदत आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे.

विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची मागणी:

डॉ. गोऱ्हे यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसह मानसिक आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवली आहे. राज्यातील तरुण मुलींसाठी महाविद्यालयीन स्तरावर विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counselling) अनिवार्य करावे, अशी त्यांची मागणी आहे. यासह व्यापक जनजागृती मोहीम, प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती आणि गोपनीय तक्रार नोंद प्रणाली सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

“डॉ. गौरीसारख्या सुशिक्षित मुलींचे असे मृत्यू होणे ही सामाजिक वेदना आहे. हा केवळ एका कुटुंबाचा शोक नसून, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे,” असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!