नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित – मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पोलिसांवरील हल्ले सहन केला जाणार नाही

मुंबई प्रतिनिधी : नागपूर शहरात सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती देत हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा स्पष्ट आरोप केला. तसेच पोलिसांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या हिंसाचारात तीन उपायुक्तांसह एकूण ३३ पोलीस जखमी झाले असून, एका उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला झाला आहे. याशिवाय पाच नागरिक जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा असून, ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
काय घडलं नागपुरात?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी महाल भागात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ‘औरंगजेब कबर हटाओ’ आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान गवताची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली होती. यानंतर अफवा पसरवण्यात आली की, त्या कबरवर धार्मिक मजकूर होता. यानंतर नमाज संपल्यानंतर मोठा जमाव जमला आणि हंसापुरी भागात २०० ते ३०० लोकांनी दगडफेक सुरू केली. यामध्ये १२ दुचाकींचे नुकसान झाले.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुसऱ्या घटनेत एक क्रेन आणि जेसीबी जाळण्यात आले. यावेळी दगडफेकीसाठी ट्रॉलीभर दगड आधीच साठवून ठेवले होते, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. काही ठिकाणी निवडकपणे घरे व दुकाने लक्ष्य करण्यात आली, यामागे निश्चितच सुनियोजित कट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कडक उपाय
या घटनेनंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी ५ गुन्हे दाखल केले असून, ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या ५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याचे पोलीस महासंचालकांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यस्था राखण्याचे आदेश दिले आहेत.
फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे, येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तरच आपण प्रगतीकडे जाऊ. यापुढे कोणीही दंगा केला, तर जात-धर्म न पाहता कठोर कारवाई केली जाईल.”
छावा चित्रपटामुळे भावना उचंबळल्या, संयम ठेवण्याचे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी ‘छावा’ चित्रपटामुळे लोकांच्या भावना उचंबळल्या असल्याचे सांगत संयम राखण्याचे आवाहन केले. “औरंगजेबाविषयीचा राग बाहेर येतो आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये. राज्याची शांतता अबाधित राखणे हीच खरी प्रगती आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप – हे नियोजनबद्ध षडयंत्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करत “औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे आणि हे देशद्रोहच आहे.” असे ठाम मत मांडले.
ते पुढे म्हणाले, “ज्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले, त्याच्या मुळाशी सरकार जाईल. नागपूरमध्ये पोलिसांनी मध्यस्थी करून शांतता राखली, तरी काही तासांत दोन ते पाच हजारांचा जमाव कसा जमला? मोठे दगड कुठून आले? पेट्रोल बॉम्ब कुणाकडे होते? हे सर्व नियोजनबद्ध षडयंत्र असून एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले.”
शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही टीका केली, “मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करणे अत्यंत निंदनीय आहे. सपकाळ यांनी माफी मागावी.”
कठोर कारवाईचे संकेत
दरम्यान, जालना शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान झाल्याचा मुद्दा आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले.
नागपूरमधील हिंसाचार हा केवळ अचानक उसळलेला नाही तर संपूर्ण पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांवरील हल्ले सहन केला जाणार नाहीत, राज्यातील शांतता बिघडवणाऱ्यांवर जात-धर्म न पाहता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. महाराष्ट्राची शांतता आणि प्रगती अबाधित ठेवण्यासाठी सरकार कणखरपणे उभे राहील, असा संदेश या विधानातून देण्यात आला आहे.