वाहतूककोंडी मोकळी करण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग (अली यावर जंग मार्ग) द्वि-स्तरीय करावा; आमदार सुनिल प्रभु यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम द्रुतगती महामार्ग , ज्याचे संक्षिप्त रूप WEH महाराष्ट्राचे माजी राज्यपाल यांच्या नावावरून अधिकृतपणे अली यावर जंग मार्ग असे आहे, हा मुंबईतील एक प्रमुख उत्तर-दक्षिण ८-१० पदरी रस्ता आहे , जो मीरा रोड उपनगरापासून वांद्रे पर्यंत पसरलेला आहे अंदाजे २५.३३ किमी (१५.७४ मैल) महामार्ग माहिम खाडीजवळून सुरू होतो आणि शहराच्या उत्तरेकडील हद्दीत काशीमिरा पर्यंत जातो आणि घोडबंदर गावातील राष्ट्रीय महामार्ग ४८ ला जोडतो. हा रस्ता मुंबई शहराला त्याच्या उपनगरांशी जोडतो, हा महामार्ग मुंबईच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विले पार्ले, सांताक्रूझ, वांद्रे इत्यादी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश देखिल आहे. २०१४ साली ह्या महामार्गावरून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलद वाहतूकीसाठी २.२ किमी लांबीचा सहार उन्नत मार्ग बांधण्यात आला.
पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या (WEH) देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक सुधारण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. या महामार्गावरून दररोज ४,००,००० हून अधिक वाहने ये- जा करतात. गोरेगाव उड्डाणपूल, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) जंक्शन आणि दहिसर टोल नाका यासारख्या प्रमुख चौकांवर वारंवार होणारे अडथळे हे बऱ्याच काळापासून वाहतूक कोंडीचा विषय आहेत. तसेच हा महामार्ग अनेक महानगरपालिका वॉर्डांमधून जातो, ज्यामुळे दुभाजक, पदपथ आणि अडथळ्यांसह रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये विसंगती निर्माण होतात. यासाठी, पायाभूत सुविधांचे मानकीकरण करण्यासाठी आणि सर्व वॉर्डांमध्ये आवश्यक विकास सुनिश्चित करण्यासाठी जलद उपाययोजना महापालिकेच्या स्तरावर केल्या जाणार आहेत. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गाचे एकूण स्वरूप सुधारण्यासाठी हिरवळ सुधारण्याचे आणि सुशोभीकरणाचे प्रयत्न महापालिका करीत आहे.
मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्या करिता सागरी सेतू, सागरी महामार्ग, मेट्रो ट्रेन इत्यादी वाहतुकीचे जाळे निर्माण करण्यात आले परंतू वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. सागरी सेतू पार केल्या नंतर वांद्रे ते दहिसर पर्यंत सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी असते आणि त्यातूनच मार्ग काढत नागरिकांना अवघे २५ किलोमीटर अंतर पार करायला दोन ते अडीज तास लागतात.
आणि म्हणून या प्रमुख महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा महामार्ग द्वि-स्तरीय (Two Tier) करणे आवश्यक असल्याची मागणी आमदार सुनिल प्रभु २०१४ पासून करत असून आज मिती पर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना आखण्यात आलेली नाही. महामार्ग द्वि-स्तरीय (Two Tier) करण्यासाठी रस्त्याच्या खाली असलेल्या पायाभूत सुविधांची तपासणी करून मगच नियोजन करणे आवश्यक आहे. आणि म्हणून एमएमआरडीए प्राधिकरणा मार्फत अथवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा मार्फत, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) वा मुंबई महानगर पालिकेमार्फत विशेष नियोजन करून व निधीची तरतूद करून अली यावर जंग महामार्ग (पश्चिम द्रुतगती महामार्ग) द्वि-स्तरीय (Two Tier) करण्यात यावा जेणेकरून यावरील होणारी वाहतूककोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल. अशी आग्रही मागणी आमदार सुनिल प्रभु यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.