महाराष्ट्रमुंबई

पोलीस दलाच्या महिला कक्षामध्ये सासरच्या लोकांकडून छळ होणाऱ्या एक- दोन नव्हे तर 42 तक्रारी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुनांच्या छळांचे प्रमाण कमी असले तरी तो सुरू असल्याचे पुढे आले आहे. जिल्हा पोलीस दलाच्या महिलाकक्षामध्ये सासरच्या लोकांकडून छळ होणाऱ्या एक-दोन नव्हे तर ४२ तक्रारी गेल्या चार महिन्यांत दाखल झाल्या आहेत. ही बाब चिंताजनक आहे. दोन प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, २१ प्रकरणांमध्ये भरोसाकक्षाने सासरच्या लोकांचे समुपदेशन करून विवाहितेला न्याय मिळवून दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आदी जिल्ह्यांमध्ये हुंड्यांसाठी अजूनही विवाहितेचा छळ होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचे प्रकार कमी आहेत; परंतु थोड्या प्रमाणात का होईना सुरू आहेत.
सासरच्या मंडळींकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून सुनेचा छळ केला जात आहे. विवाहितेला संसार टिकवायचा असतो; परंतु सासरच्या लोकांकडून होणान्या छळामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत; परंतु मोठ्या विश्वासाने पोलीस भरोसा कक्षात तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना धीर देऊन त्यांचा छळ थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांमध्ये येथील भरोसा कक्षात कौटुंबिक छळाच्या ४२ तक्रारी दाखल करण्यात आल्या. यापैकी २ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले तर तब्बल २१ प्रकरणांमध्ये भरोसा कक्षाने सासरच्या लोकांचे समुपदेशन करून विवाहितेला न्याय मिळवून दिला. रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयात असलेल्या भरोसाकक्ष किंवा विशेष महिलाकक्षात पीडित महिलेची समस्या ऐकून घेतली जाते. त्याबाबत शहानिशा करून सासरच्या लोकांना समजावून सांगितले जाते; मात्र त्या महिलेला मारहाण करून त्रास दिल्यास सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल होतो. अडचणीच्या काळात पीडित महिलांना भरोसा कक्षावरच सर्वांत जास्त भरोसा असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!