शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुरु असलेल्या बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे वास्तव आहे, शेतकरी आज मोठ्या संकटात आहे, शेतमालाला भाव नाही, राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी पूर्णपणे हताश आणि निराश झालेला आहे.
अशा परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन करून या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. काँग्रेस पक्षही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहे. शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागण्यासांठी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून आंदोलने सुरु आहेत. जगाचा पोशिंदा बळीराजाच अडचणीत आहे. शेतकरी जगला तर महाराष्ट्र आणि देश जगेल, त्यामुळे शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारविरोधातील संघर्ष चालूच ठेवणार असून आगामी काळात तो आणखी तीव्र करेल.