मुंबई: राज्यात व मुंबईत देखील आज कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासात ३ हजार २४७ ने रुग्णघट नोंदविण्यात आली. तर गेल्या ऑक्टोबर महिन्यानंतर ७ महिन्यांनी ६ हजाराच्या संख्येत ही रूग्ण संख्या नोंदविली. आज केवळ ६,७२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.
या बरोबरच राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,४३,५४८ झाली आहे. काल १०,८१२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५८,००,९२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१७,८७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात सोमवारी १०१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १०१ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १८६ ने वाढली आहे.
हे १८६ मृत्यू, ठाणे-६६, पुणे-३५, पालघर-३०, नाशिक-१६, परभणी-८, रायगड-८, उस्मानाबाद-६, रत्नागिरी-३, अकोला-२, धुळे-२, लातूर-२, सातारा-२, औरंगाबाद-१, बुलढाणा-१, जळगाव-१, नांदेड-१, सांगली-१ आणि वाशिम-१ असे आहेत.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१२,०८,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,४३,५४८ (१४.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत केवळ ६११ रुग्ण
मुंबईत दिवसभरात केवळ ६११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२०९६० एवढी झाली आहे. तर १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५४१४ मृत्यूची नोंद करण्यात आली.