विराट कोहलीनं सोडलं भारतीय संघाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद

मुंबई- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीनं भारतीय संघाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याची बातमी समोर येत आहे.विराटनं स्वत: ट्विट करत ही बातमी दिली आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
विराटने एक पत्र ट्विट करत,’७ वर्ष सर्वांच्या अथक मेहनतीनं संघाला योग्य दिशा दाखवली. मी पूर्ण प्रामाणिकपणे माझे काम केले आणि त्यात कोणतीच कसर सोडली नाही. प्रवासात कुठेतरी थांबा घ्यावा लागतो आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो क्षण आला आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, परंतु आम्ही प्रयत्न करण्यात कुठेही थांबलो नाही आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवला. नेहमी १२० टक्के देण्यावर माझा विश्वास होता आणि ते मी दिले.
जेव्हा मी तसं करण्यात अपयशी ठरलो, तेव्हा मला हे माहीत होतं हे योग्य नाही. माझ्या मनात कोणतीच शंका नाही आणि माझ्या संघाशी मी प्रतारणा करू शकत नाही,’असे म्हटले आहे.
याचसोबत,’एवढा प्रदीर्घ काळ मला संघाचे नेतृत्व सांभाळण्याची संधी दिल्याबद्दल मी BCCIचे आभार मानू इच्छितो. या जबाबदारीच्या पहिल्या दिवसापासून मी जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी संघातील प्रत्येक सहकाऱ्यांनी योगदान दिले आणि कोणत्याही कठीण प्रसंगी ते डगमगले नाही.तुमच्यामुळे हा प्रवास सुंदर आणि अविस्मरणीय झाला.
रवी भाई आणि संपूर्ण यंत्रणा या यशामागचं इंजिन होते. अखेरचं पण, महेंद्रसिंग धोनीचे मनापासून आभार, त्यानं कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी योग्य व्यक्त असल्याचा विश्वास त्यानं दाखवला.’असेही मत त्याने व्यक्त केले आहे.