सिंधुदुर्गतील कोळोशीचा नागपंचमी उत्सव: परंपरा जपणारा ‘भल्ली भल्ली भावय’ खेळ

सिंधुदुर्ग : कोकणात श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा निसर्गाशी एकरूप झालेला गाभा. येथे प्रत्येक सणाला केवळ धार्मिक महत्त्व नसते. तर तो गावकन्यांच्या जीवनशैलीशी संस्कृतीशी आणि परंपरेशी निगडित असतो. त्याच परंपरेचे एक अनोखे आणि थरारक रूप म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कोळोशी गावातील पावणादेवी मंदिरात साजरा होणारा नागपंचमीचा उत्सव. कोळोशी हे निसर्गरम्य गाव कणकवलीपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं ग्रामदैवत पावणादेवी आहे आणि तिची भक्तिभावाने पूजा शेकडो वर्षांपासून केली जाते. नागपंचमीच्या दिवशी येथे साजरा होणारा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण गावाच्या एकतेच साहसाच आणि समर्पणाचं दर्शन घडवतो. नागपंचमीच्या दिवशी येथे एक खास पारंपरिक सोहळा साजरा केला जातो, ज्यात भल्ली भल्ली भावय खेळ एक अत्यंत रहस्यपूर्ण प्रथा असते. उत्सवाच्या मुख्य दिवशी पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात साकारला जातो तो “वाघ आणि नाग यांचा नाट्यमय संघर्ष. एक युवक वाघाच्या वेशात प्रचंड ऊर्जा आणि जोशात मंदिरात प्रवेश करतो. दुसरा युवक नागाच्या वेशात सजून गाभान्याजवळ उभा असतो. वाघ त्याच्यावर झडप घालतो आणि त्या क्षणी संपूर्ण गाव ““भल्ली भल्ली भावय…” अशी एकजूट आरोळी देऊन नागदेवतेचे रक्षण करतो. हा केवळ एक खेळ नाही. तो एक रूपकात्मक सादरीकरण आहे. भल्ली भल्ली भावय…” ही एक आरोळीसारखी हाक आहे, जी नागदेवतेला वाघापासून वाचवण्यासाठी गावकरी देतात. ही हाक केवळ भाषिक नाही, तर ती एक सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि भावनिक स्तरावरची अभिव्यक्ती आहे. गावकरी एकाच वेळी एका तालात आणि एका सुरात हे बोलतात. या वाक्यातून नागदेवतेला वाघाच्या संकटापासून संरक्षण देण्याचं प्रतीक होत.
गावातील वयोवृद्ध सांगतात की, पूर्वी नागदेवतेला वाघाने त्रास दिला होता. पावणादेवीच्या कृपाशक्तीमुळे नाग वाचला आणि तो दिवस आजही गावकऱ्यांच्या स्मरणात आहे. त्या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ या खेळाची परंपरा आजवर टिकून आहे आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत हस्तांतरित केली जात आहे.
या उत्सवात संपूर्ण गाव सहभागी होतो. स्त्रिया पारंपरिक नऊवारी नेसून फुलांनी सजवलेल्या रांगोळ्या काढतात. देवतेसाठी मोदक, पुरणपोळी, उकडीचे पदार्थ अर्पण केले जातात. ढोल-ताशांचा गजर तुतारीचा निनाद, आणि श्रृंगांचा आवाज मंदिर परिसरात दरवळतो.
लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण भल्ली भल्ली भावय…. म्हणत एक सांघिक शक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवतो. ही परंपरा फक्त देवतेच्या रक्षणाची कथा सांगत नाही, तर गावकन्यांमधील एकात्मतेची, शौर्याची आणि श्रद्धेची गोष्टही सांगते. कोळोशीचा नागपंचमी उत्सव म्हणजे पारंपरिकता आणि सर्जनशीलतेच जिवंत रूप आहे.