क्राइममहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे हात कोण बांधतेय का? – उद्धव ठाकरे यांचा सवाल

मुंबई प्रतिनिधी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. जर मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील, तर त्यांचे स्वागत आहे. पण त्यांचे हात कोणी बांधले आहेत का? असा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

देशमुख हत्याकांडावर तीव्र प्रतिक्रिया
९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. सीआयडीने या प्रकरणात न्यायालयात १५०० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

देशमुख यांना अमानुष मारहाण झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या आमदारांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, हे फोटो आणि व्हिडिओ आधी सरकारकडे होते का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

“सरकारच्या भानगडी बाहेर येत आहेत”
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नवे मुद्दे समोर येतील. सरकारवरील गंभीर आरोप उघड होत आहेत. मुख्यमंत्री जर खरोखर पारदर्शी प्रशासन राबवत असतील, तर त्यांचे स्वागत आहे. मात्र त्यांचे हात कोणी बांधले आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“महाराष्ट्रातील जनतेला भ्रष्टाचार आणि लपवाछपवीचा कंटाळा आला आहे. त्यांना पारदर्शक आणि जबाबदार सरकार हवे आहे. मात्र, एकमेकांचे गैरकृत्य लपवणारे सरकार कोणालाही नको,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोटो लपवले का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे फोटो आणि व्हिडिओ आधीपासून होते, मात्र त्यांनी ते दडवले, असा आरोप होत आहे. यावर पत्रकारांनी ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, “या आरोपांवर उत्तर देणे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. डिसेंबरपासून हा विषय चर्चेत आहे. मग फोटो आधी का बाहेर आले नाहीत?” असा सवाल त्यांनी केला.

“मुंडे यांच्या राजीनाम्याचे खरे कारण काय?”
धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण प्रकृती अस्वास्थ्य सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे म्हटले. ठाकरे म्हणाले, “जर मुंडे यांची प्रकृतीच खराब असेल, तर हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतरच त्यांचा राजीनामा का घेतला गेला?”

याव्यतिरिक्त, हे सर्व मुद्दे अधिवेशन सुरू असताना का बाहेर आले? दोन महिने हे फोटो कुठे होते? हे मुद्दे आधीच समोर का आले नाहीत? असे प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केले.

“सरकारने स्पष्टता द्यावी”
राज्याच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर आहे का? या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री स्पष्ट उत्तर देतील का? आणि हे मुद्दे राजकीय हेतूने दडवले गेले का? याची जनतेने उत्तरं मागायला हवीत, असे ठाकरे यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!