रत्नागिरी, सिंधुदुर्गात वानर-माकड निर्बिजीकरण केंद्र सुरु करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन.

रत्नागिरी : कोकणात वानर, माकडांनी घातलेल्या उच्छादांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात माकड वानर निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी दापोलीत शेतकरी-बागायतदारांना दिले.
दापोली तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या त्रासाबाबत शेतकरी व बागायतदारांची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी मंत्रालयात वनमंत्री नाईक यांच्या दालनात पार पडली. बैठकीत वन्यप्राण्यांचा त्रास, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, वनविभागाकडून असहकार्याची भूमिका याबरोबरच विविध विषयांवर चर्चा झाली. वनमंत्र्यांनी या सर्व प्रश्नांवर सहकार्याची हमी दिल्याची माहिती कुडावळे येथील बागायतदार विनायक महाजन यांनी पत्रकारांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत वन्यप्राणी पारध परवानगीबाबत न्यायालयीन स्थगितीची वस्तुस्थिती ही फक्त सुमोटो परवानगीस स्थगिती असल्याचे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे शेतीस उपद्रव करणाऱ्या वन्यजीवांची पारध करण्याची परवानगी कायद्याच्या अधीन राहून संबंधित अधिकारी देवू शकतो. त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच शेती संरक्षणासाठी आवश्यक शस्त्र परवान्यात येणाऱ्या अडचणींवर त्यांनी तेथूनच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करत यामधील अडचणी सोडविण्यास सांगितले.