ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलासा; पॉलीटेक्निक प्रवेशासाठी मुदतवाढ

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी ६ जुलैपर्यंत मुदतवाढ; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा
मुंबई, दि. २ जुलै २०२६ : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याने राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्या तसेच प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, मूळ अंतिम मुदत २ जुलै २०२६ होती. या कालावधीत राज्यभरातून १ लाख ६१ हजार ७८६ उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ३२ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, शुल्क भरणे तसेच तांत्रिक अडचणींमुळे अर्ज पूर्ण करण्यात अडथळे आले होते. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. कोणताही पात्र विद्यार्थी केवळ मुदतीअभावी वंचित राहू नये, हा शासनाचा स्पष्ट उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
इच्छुक विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन ६ जुलै २०२६ पर्यंत आपला अर्ज निश्चित करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






