CBT, Normalization रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

MPSC कडून प्रतिसाद नसल्याने आंदोलन तीव्र; CBT आणि Normalization विरोधात काळी फीत आंदोलनाचा निर्णय
काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरूच
मुंबई, दि. ९ जुलै २०२६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization प्रक्रिया लागू करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस पार पडला.
सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातील विद्यार्थी, पालक, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही सह्यांच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
मात्र, आंदोलनाला दोन दिवस पूर्ण होऊनही MPSC प्रशासनाकडून आंदोलकांशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही किंवा विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १० जुलैपासून आंदोलनात सहभागी होणारे विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातावर किंवा छातीवर काळी फीत बांधून निषेध नोंदविणार आहेत.
CBT आणि Normalization रद्द करण्याची मागणी
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (MAT) तलाठी भरती २०२३ प्रकरणात सायबर गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या संशयासंदर्भात न्यायवैद्यकीय तपास तसेच सायबर क्राईम विभागामार्फत चौकशीचे निर्देश दिल्याचा संदर्भ देत काँग्रेसने CBT पद्धतीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला असून, महाविकास आघाडीच्या आमदारांनीही हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्याचे सांगण्यात आले. MPSC अध्यक्षांकडे विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांसोबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आंदोलन व्यापक करण्याचा इशारा
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थी, पालक, युवक आणि सामाजिक संघटनांना आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. हा केवळ विद्यार्थ्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्राच्या भविष्यासाठीचा मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे, तसेच काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करून CBT आणि Normalization संदर्भातील निर्णय मागे घ्यावेत, ऑफलाइन परीक्षा पद्धत कायम ठेवावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन आणि काळी फीत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.






