आधुनिक सुविधांनी सुसज्ज चित्रनगरी उभारणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक ओळख कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, विविध प्रकारचे सेट्स आणि इतर सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी चित्रपटांचा आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये असून कलात्मकदृष्ट्या देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश होतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मराठी रंगभूमीनेही आपली समृद्ध परंपरा आणि प्रतिष्ठा आजवर जपली आहे. याच सांस्कृतिक वारशाच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण देण्यात सलीम-जावेद या जोडीचे आणि सलीम खान यांचे मोठे योगदान असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रभावी नायक आणि अजरामर व्यक्तिरेखा साकारल्या. ‘अँग्री यंग मॅन’ ही संकल्पना लोकप्रिय होण्यात त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या कार्याचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कलेच्या क्षेत्रातील ‘३६० डिग्री मॅन’ असे संबोधले. ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांची त्यांनी साकारलेली भूमिका प्रभावी ठरल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओक यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी तीन दशकांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘मर्दानी’सारख्या चित्रपटांतून त्यांनी स्त्रीकेंद्री भूमिका प्रभावीपणे मांडल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.





