लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी संघर्षाची हाक

वोटचोरी, सीटचोरी, पक्षचोरीनंतर आता नागरिकता चोरीचा मोठा धोका : मिनाक्षी नटराजन

“माझा उमेदवारी अर्ज रद्द करणे हा लोकशाहीवरचा हल्ला; आता दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची गरज” : हर्षवर्धन सपकाळ

टिळक भवन येथे काँग्रेसचा “लोकशाही वाचवा निर्धार सभा” कार्यक्रम

मुंबई, दि. २ जुलै २६ : देशात सध्या लोकशाहीसमोर गंभीर संकट उभे असल्याचे सांगत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणा प्रभारी मिनाक्षी नटराजन यांनी “वोटचोरी, सीटचोरी, पक्षचोरीनंतर आता नागरिकता नाकारण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचे अधिकार आणि मानवी हक्क हिरावले जात आहेत, त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी आवाज उठवावा,” असे आवाहन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती. या सभेस प्रमुख पाहुण्या म्हणून मिनाक्षी नटराजन आणि तुषार गांधी उपस्थित होते, तर सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेसचे तेलंगणा सहप्रभारी सचिन सावंत, राष्ट्रीय प्रवक्ते तथा माजी आमदार चरणजित सप्रा, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, तिस्ता सेटलवाड, चित्रा राणे, जयंत दिवाण आदी उपस्थित होते.

सभेत बोलताना मिनाक्षी नटराजन म्हणाल्या की, माझा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज रद्द होणे हा वैयक्तिक मुद्दा नसून एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार उभा करण्यात आला आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आला. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून अन्यायकारक निर्णय देण्यात आला, तर दुसऱ्या उमेदवाराला त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. देशभरात याविरोधात संताप व्यक्त होत असून माझ्यासाठी राज्यसभा नाही तर जनतेचा आवाज महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द करणे हा केवळ त्यांच्यावर नव्हे तर संपूर्ण लोकशाहीवर झालेला अन्याय आहे. देश सध्या “करो या मरो” परिस्थितीत असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची गरज निर्माण झाली आहे. आजचा संघर्ष हा संविधानवादी आणि मनुवादी विचारांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, मागील १२ वर्षांत लोकशाही व्यवस्था कमकुवत झाली असून विरोधकांचा आवाज दडपला जात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी १५ ते २५ वयोगटातील तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ते देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग आहेत. इतिहासाची मोडतोड थांबवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

तुषार गांधी म्हणाले की, आजची परिस्थिती ब्रिटिश राजवटीपेक्षा अधिक गंभीर आहे. देशात वैचारिक गुलामगिरी निर्माण केली जात आहे. सरकारविरोधात रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष उभा करणे गरजेचे आहे. संविधानाला धोका निर्माण करणाऱ्या संस्था कमकुवत केल्या जात असल्याने त्या वाचवणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात उल्का महाजन आणि तिस्ता सेटलवाड यांनीही मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!