हत्तींच्या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू; विशेष टास्क फोर्सची विजय वडेट्टीवार यांची मागणी

चंद्रपूर–गडचिरोलीतील वाढत्या हत्ती–मानव संघर्षावर नियंत्रणासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी
मुंबई, दि. ३ : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत्या हत्ती–मानव संघर्षाचा गंभीर प्रश्न विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने विशेष टास्क फोर्स स्थापन करावी, अशी मागणी केली. हत्तींच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत चार नागरिकांचा मृत्यू झाला असून नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वडेट्टीवार म्हणाले की, २ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड–सोनापूर मार्गावर रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्तीने त्यांचा पाठलाग करून त्यांना चिरडले. ही अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक घटना असून अशा घटना सातत्याने घडत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

ही घटना माझ्या मतदारसंघातील असून, आतापर्यंत रानटी हत्तींच्या हल्ल्यांमध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी सध्या ३० ते ३२ हत्तींचा कळप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संचार करत असल्याचे नमूद केले. या हत्तींकडून शेतपिकांचे मोठे नुकसान होत असून शेकडो घरे आणि झोपड्यांचीही हानी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाकडून सध्या केवळ हत्ती हाकलण्याचे प्रयत्न होत असून, गडचिरोलीतून हाकललेले हत्ती चंद्रपुरात आणि चंद्रपुरातून हाकललेले हत्ती पुन्हा गडचिरोलीत जात असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी आणि परिणामकारक उपाययोजना होत नसल्याची टीका त्यांनी केली.
हत्ती–मानव संघर्ष हाताळण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, हत्तींच्या हालचालींवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातत्याने लक्ष ठेवावे, नागरिकांना वेळेवर इशारा देणारी प्रभावी यंत्रणा उभारावी आणि या संपूर्ण प्रश्नासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच खाणकाम आणि जंगलातील अधिवासावर झालेल्या परिणामांमुळे हत्तींचे पारंपरिक मार्ग बाधित होत असून त्यातूनच हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर विधानसभा अध्यक्षांनीही हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मानवी जीवितहानी होत असेल, तर शासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही हत्तींच्या हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवता येत नसेल, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात शासनाने कोणत्या उपाययोजना करणार आहे, याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन सादर करावे, असे निर्देश त्यांनी दिले.





