पावसामुळे महाराष्ट्र ठप्प; तातडीने आणीबाणी जाहीर करा : सुप्रिया सुळे

‘एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला’; राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे, दि. ६ जुलै : मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, मुंबई–पुणे दळणवळण पूर्णपणे ठप्प झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना महामार्ग, मिसिंग लिंक प्रकल्प तसेच इतर महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. दरडी कोसळणे, रेल्वे सेवा विस्कळीत होणे आणि अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होणे यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात यापूर्वीही पाऊस झाला आहे, मात्र सध्याची परिस्थिती पूर्वी कधीही पाहिलेली नाही. राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन वास्तव चित्र जनतेसमोर मांडावे, अशी मागणीही त्यांनी केली.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करताना सुळे म्हणाल्या की, या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते, मात्र त्यानंतर समोर आलेले व्हिडिओ आणि परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे. मोठा निधी खर्च होऊनही अपेक्षित सुरक्षितता आणि परिणाम दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकल्पाचे सुरक्षा ऑडिट झाले होते का आणि नैसर्गिक आपत्तीचा विचार करून नियोजन करण्यात आले होते का, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पायाभूत प्रकल्पांवरही टीका
वसई-विरार, भांडूप आणि मुंबई परिसरातील विविध प्रकल्पांमध्ये सुरक्षितता आणि पर्यावरणीय बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत त्यांनी या सर्व प्रकल्पांची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली.
वाहतूक ठप्प; जनजीवन विस्कळीत
ताम्हिणी घाट, जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंक या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांतील संपर्क विस्कळीत झाल्याचे त्या म्हणाल्या. “एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाल्याचे चित्र दिसत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
सरकारच्या प्राधान्यांवर प्रश्न
सत्ताधारी नेते विरोधकांवर कारवाई करण्यात व्यस्त असून नागरिकांच्या सुरक्षिततेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना जनतेत निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
इतर मुद्दे
राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली असून हा मुद्दा आगामी संसदेच्या अधिवेशनात इंडिया आघाडी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना त्यांनी फेटाळले असून, दोन्ही पक्षांमध्ये दीर्घकाळापासून सहकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






