पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; प्रशासन २४x७ अलर्ट मोडवर

नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीची मदत द्यावी; प्रशासनाने समन्वयाने काम करावे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनीही प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
तातडीच्या मदत व बचाव कार्याचे निर्देश
अतिवृष्टीमुळे बाधित भागांमध्ये तात्काळ मदत पोहोचवावी, गावांचा संपर्क तुटल्यास युद्धपातळीवर उपाययोजना करून तो पूर्ववत करावा, असे निर्देश देण्यात आले. मानवी जीविताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य मानून सर्व निर्णय घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.
नियंत्रण कक्ष २४x७ पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवून प्रत्येक तासाला परिस्थितीचा आढावा घ्यावा. धोकादायक भागांतील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून त्यांना सुरक्षित निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूर, भूस्खलन आणि धरण विसर्गाबाबतचे इशारे एसएमएस, सोशल मीडिया, ग्रामपंचायत आणि स्थानिक यंत्रणांमार्फत वेळेत द्यावेत. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय सोडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून बचावकार्य तातडीने राबवावे. बंद रस्ते, पूल आणि घाटांवर कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांना धोकादायक भागात जाण्यापासून रोखावे, तसेच अफवांवर नियंत्रण ठेवून अधिकृत माहितीच प्रसारित करावी, असेही त्यांनी सांगितले.
सेवा पूर्ववत करण्यावर भर
वीज, पाणी, आरोग्य आणि दळणवळण सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर काम करावे. प्रत्येक दोन तासांनी परिस्थितीचा अद्ययावत अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशील भागांवर वैयक्तिक लक्ष ठेवून तातडीने निर्णय घ्यावेत; कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष
वारीदरम्यान येणाऱ्या वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आयटी पार्क आणि औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
धरणांमधील पाण्याची पातळी वाढल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून अनेक पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे किंवा पाण्यात उतरू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिदक्षतेचा इशारा दिला असून प्रशासनाने समन्वयाने काम करावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करून संकटाच्या काळात एकजुटीने परिस्थितीचा सामना करावा, असेही त्यांनी म्हटले.




