आळंदीच्या विकासकामांसाठी १० कोटींची मदत; पूरग्रस्त सुविधांच्या दुरुस्तीला वेग

पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय; पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी १० कोटींचा निधी मंजूर
मुंबई : मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथील नागरी व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतील तातडीच्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त भागातील कामे तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
आगामी आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आणि भाविक आळंदीत दाखल होत असताना पुरामुळे अनेक सुविधा बाधित झाल्या आहेत. भाविकांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरती स्वच्छतागृहे वाहून गेली असून, आळंदीचे जलशुद्धीकरण केंद्र पाण्याखाली गेले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पथदिवे कोसळले आहेत. तसेच रस्ते खराब झाले असून नदीलगतचे संरक्षक कठडेही काही ठिकाणी तुटले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असून भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या आढाव्यानंतर नगरविकास विभागाने आळंदीतील अत्यावश्यक कामांसाठी तातडीने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे.
मंजूर निधीपैकी ५ कोटी रुपये ‘वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठीच्या विशेष अनुदान’ अंतर्गत देण्यात येणार आहेत. यामधून आळंदी नगरपरिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्था आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी ३ कोटी रुपये, नवीन पथदिवे व पोल उभारणीसाठी १ कोटी रुपये, तसेच भाविकांच्या आरोग्य व सुविधांसाठी शौचालये आणि स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
याशिवाय पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल आणि संबंधित गटारांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी ‘विशेष रस्ता अनुदान’ योजनेअंतर्गत अतिरिक्त ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आळंदीतील पूरग्रस्त नागरिक आणि वारकरी भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, आवश्यक सुविधा पूर्ववत करण्याच्या कामांना वेग येणार आहे.






