शवविच्छेदन केंद्रांतील त्रुटींवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आवाज; सुधारणांचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शवविच्छेदन केंद्रांतील त्रुटींवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शासनाचे लक्ष वेधले
शीतगृहे, मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि मृतदेहांच्या गोपनीयतेबाबत सुधारणा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई, दि. ८ : राज्यातील शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) केंद्रांमधील रिक्त पदे, अपुऱ्या सुविधा, शीतगृहांची कमतरता तसेच मृतदेहांच्या गोपनीयतेच्या संरक्षणाचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला. या चर्चेत शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रामीण भागातील शवविच्छेदन केंद्रांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधत आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक सुधारणा टप्प्याटप्प्याने राबविण्याचे आश्वासन दिले.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य श्रीमती चित्रा वाघ, श्री. प्रसाद लाड, ॲड. निरंजन डावखरे यांच्यासह इतर सदस्यांनी शवविच्छेदन केंद्रांशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले.
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रामीण भागातील अनेक शवविच्छेदन गृहांमध्ये जागेचा अभाव असल्यामुळे एकापेक्षा अधिक मृतदेह आल्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणले. आवश्यकतेनुसार अतिरिक्त जागा, आधुनिक शीतगृहे, पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान मृत व्यक्तीची मानवी प्रतिष्ठा आणि गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सभागृहात अधोरेखित केले.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ५३३ शवविच्छेदन केंद्रांपैकी अनेक ठिकाणी मृतदेहांची संख्या कमी असते. मात्र, अपघातप्रवण क्षेत्रे आणि मोठ्या रुग्णभार असलेल्या ठिकाणी शीतगृहांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन प्राधान्य देणार आहे.
शवविच्छेदनातील वैद्यकीय निरीक्षणे, मृतदेहाची स्थिती आणि अहवालातील माहिती ही अत्यंत संवेदनशील व गोपनीय स्वरूपाची असते. ही माहिती केवळ नियमानुसार तपास यंत्रणांना उपलब्ध करून दिली जाते. अशा माहितीचा गैरवापर किंवा सार्वजनिक प्रसार केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील गृह आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील शवविच्छेदन केंद्रांमध्ये मंजूर ९३ पदांपैकी ५५ पदे कार्यरत असल्याची माहिती देत मुख्यमंत्री म्हणाले की, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. वर्ग-४ संवर्गातील बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन सेवा अधिक सक्षम करण्यात येत आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयासह इतर ठिकाणच्या अत्याधुनिक शवविच्छेदन केंद्रांना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शवविच्छेदन प्रक्रियेत मृत व्यक्तीच्या शारीरिक तपशीलांची गोपनीयता आणि मानवी प्रतिष्ठा राखण्याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतल्याचे यावेळी स्पष्ट झाले.






