महिला ई-रिक्षा योजनेला गती; एमएमआरमध्ये मार्ग निश्चितीचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

एमएमआरमध्ये पिंक ई-रिक्षांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना द्या – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महिला ई-रिक्षा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना
बॅटरी तंत्रज्ञान सुधारण्यासाठी उत्पादक कंपन्यांशी तातडीने चर्चा करण्याचे निर्देश

मुंबई, दि. १४ : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरात महिला ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशा स्वतंत्र आणि योग्य मार्गांची निश्चिती करण्यात यावी. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळण्याबरोबरच महिला ई-रिक्षा सेवा अधिक सक्षम होईल, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महिला ई-रिक्षा योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, महिला व बालविकास विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, कमी वेगाच्या ई-रिक्षा मुख्य रस्ते किंवा महामार्गांवर चालविण्याऐवजी अंतर्गत मार्गांवर चालविल्यास वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल. यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे योग्य मार्ग निश्चित करावेत. तसेच ई-रिक्षांमध्ये उपलब्ध जीपीएस प्रणालीचा वापर करून त्यांच्या हालचालींचे प्रभावी नियंत्रण आणि निरीक्षण करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

ई-रिक्षांचा वेग आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञानात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित उत्पादक कंपन्यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणा आणि आवश्यक तांत्रिक बदलांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, महिला ई-रिक्षा योजनेअंतर्गत शासनाचा आर्थिक सहभाग २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. सुधारित योजनेनुसार ५० टक्के कर्ज, ४० टक्के शासनाचे अनुदान आणि १० टक्के लाभार्थी हिस्सा अशी आर्थिक रचना असेल.

एमएमआर परिसरात सध्या लागू असलेल्या तांत्रिक निकषांमुळे एल-३ प्रवर्गातील ई-रिक्षा सुरू करता आलेल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ लक्षात घेऊन निवडक मार्गांवर महिला ई-रिक्षा योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!