विरोधकांना उत्तरं देण्यास सरकार सक्षम, अजित पवारांचं खुलं आव्हान

मुंबई – कोरोना संसर्गाच्या संकटामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा केले आहे. देशातील इतरही काही राज्यांमध्ये दोन, तीन किंवा पाच दिवसांची अधिवेशने झाली आहेत.कोरोना आणि ओमायक्रॉनचे सावट लक्षात घेता सर्व नियमांचे पालन करुन हे अधिवेशन घेणार असल्याचे अजित पवार म्हणाले. या अधिवेशनात शक्ती विधेयक मांडले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले. विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची राज्य सरकारने तयारी ठेवली असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
या अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, परिक्षा घोटाळा, कोविडचा धोका, वीज बिलाचा मुद्दा तसेच विदेशी मद्य कपातीच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे अजित पवार म्हणाले. या सर्व मुद्यांना उत्तरे देण्यासाठी सरकार तयार असल्याचे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत चांगली आहे. ते उद्या सभागृहात उपस्थित राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. विरोधकांनी उमेदवार द्यायचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये समोर उमेदवार असलाच पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. त्यांना आरोप करण्याशिवाय दुसर काहीच सुचत नसल्याचे अजित पवार म्हणाले. आमच्याकडे १७० आमदारांचे पाठबळ असताना राष्ट्रपती राजपट कशी लागणार. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काही न बोललेचं बर असेही अजित पवार म्हणाले.