विकासकामांच्या दर्जावर प्रश्न; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर जयंत पाटील यांचा घणाघात
“विकास काही ठिकाणी पुराच्या पाण्यात, खड्ड्यांत आणि कोसळलेल्या दरडींमध्ये दिसतोय” – जयंत पाटील
मुंबई, दि. ९ जुलै : राज्यात ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विधानसभेतील अल्पकालीन चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निकृष्ट दर्जाची पायाभूत कामे, अपुरी आपत्ती व्यवस्थापन तयारी आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अधिक प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले की, राज्यात पावसाचे आणि ढगफुटीसदृश घटनांचे प्रमाण वाढत असताना त्यानुसार बांधकामे आणि पायाभूत सुविधांचे नियोजन झालेले दिसत नाही. रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची स्थिती चिंताजनक असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.
“आपला विकास काही ठिकाणी पुराच्या पाण्यात खेळताना, रस्त्यांवरील खड्ड्यांत तरंगताना, कोसळलेल्या दरडींवर घसरताना आणि पडलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये लपाछपी खेळताना दिसत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि पायाभूत सुविधांवर प्रश्न
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे काही काळ ठप्प झाल्याचा मुद्दा उपस्थित करत जयंत पाटील यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले. मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांमध्ये तांत्रिक तपासणी, सुरक्षितता आणि हवामानाशी संबंधित जोखमींचे मूल्यमापन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“पहिल्याच मोठ्या पावसात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असेल तर पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण होतात. संबंधित तज्ज्ञ, कन्सल्टंट आणि अभियंत्यांच्या जबाबदारीची चौकशी झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
विरोधकांचे काम सरकारवर दोषारोप करणे नसून, त्रुटी निदर्शनास आणून देणे आणि सुधारणा करण्याचा आग्रह धरणे आहे. मात्र, प्रत्येक पायाभूत प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपत्तीतील जीवितहानीचा मुद्दा उपस्थित
अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या दुर्घटनांचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले. मुंबई, रायगड, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती, दरडी कोसळणे, इमारत दुर्घटना आणि झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांना मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथे इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
हवामान बदल आणि शहर नियोजनावर चिंता
मुंबईतील वाढते शहरीकरण, वृक्षतोड, कांदळवन आणि मिठागरांचे संरक्षण याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. हवामान बदलामुळे कमी वेळेत अतिवृष्टीच्या घटना वाढत असून, मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे ‘क्लायमेट ऑडिट’ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
पश्चिम घाटातील डोंगर उत्खननामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढत असल्याचे सांगत त्यांनी पर्यावरणीय संतुलन राखण्याचे आवाहन केले. माधव गाडगीळ समितीच्या अहवालाचाही त्यांनी संदर्भ दिला.
वृक्षतोड आणि सिमेंट रस्त्यांच्या कामावर टीका
मुंबईतील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांदरम्यान झाडांच्या मुळांना धोका निर्माण झाल्याचा आरोप करत जयंत पाटील यांनी अलीकडील वृक्ष कोसळण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली.
“नागरिकांच्या जीविताची सुरक्षा आणि सार्वजनिक पैशांचा योग्य वापर याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. मोठ्या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
राज्यातील पायाभूत सुविधा विकासास विरोध नसून, त्या जागतिक दर्जाच्या, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असाव्यात, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.






