अजितदादा पवारांना पद्मविभूषण देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई, दि. ९ जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अजितदादा पवार यांच्या नावाचा पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्कारासाठीचा शिफारस प्रस्ताव महाराष्ट्र शासनामार्फत तातडीने केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्राने एक अनुभवी आणि लोकप्रिय नेतृत्व गमावले. अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
एक कणखर प्रशासक, सातत्याने जनतेसाठी कार्य करणारे लोकप्रतिनिधी आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या दीर्घकालीन लोकसेवेचा आणि योगदानाचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार (मरणोत्तर) प्रदान करण्यात यावा, अशी भावना चेतन तुपे यांनी व्यक्त केली.
या निवेदनात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाची भूमिका, पक्ष संघटनेवरील पकड, प्रशासनातील कार्यक्षमता, विकासाभिमुख धोरणे, शेतकरी आणि सहकार क्षेत्रासाठी केलेले योगदान तसेच जनकल्याणकारी योजनांमधील सहभाग यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
अजितदादा पवार यांचे निधन ही राज्यासाठी मोठी हानी असून, त्यांच्या दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि जनसेवेचा मरणोत्तर सन्मान होणे हे महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानाची बाब ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विधानमंडळ सदस्य उपस्थित होते.




