थरारक ! कठडा तोडून बावनदी पुलावर लोंबकळला ट्रक,दैव बलवत्तर म्हणून ट्रकचालक बचावला

संगमेश्वर :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी पुलावर शनिवारी सकाळी सुमारे ७ वा. च्या दरम्यान तीन ट्रक आणि कारमध्ये झालेल्या विचित्र अपघातामुळे सुमारे ५ तास वाहतूक ठप्प झाली होती. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात एक ट्रकचालक बचावला. हा अपघात इतका भीषण होता की एका ट्रकचा पुढचा भाग पुलावर लोंबकळत होता. त्यात असलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर पोलिस येथे दाखल झाले. सुमारे पाच ते सहा तासांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वाहनांचा अडथळा दूर केल्यावर मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली.
या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नसून एकजण जखमी झाला. मारुती जानू पाटील (वय 55, रा. पाचुंबरे, ता. शिराळा,जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. अमोल जगदीश केसरकर (वय 31, रा. मोरवे खंडाळा, जि. सातारा) यांनी संगमेश्वर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ते महिंद्रा ट्रक (एमएच-46-एआर-3389) तसेच जनार्दन जयवंत शेळके हे महिंद्रा ट्रक (एमएम-46-एआर-3419) चालवत पाठोपाठ निवळी ते सातारा असे जात होते. त्याचवेळी मारुती पाटील हा टाटा ट्रक (एमएच-09-बीसी-9181) घेऊन मुंबईहून भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने आला.
बावनदीच्या ब्रिटिशकालीन अरुंद पुलावर मध्यभागी ही वाहने आली असता मारुती पाटील याचा ट्रकवरीला ताबा सुटल्यामुळे ट्रकची धडक प्रथम जनार्दन शेळकेच्या ट्रकला बसली. नंतर त्या पाठोपाठ येणार्या अमोल केसरकर याच्या ट्रकलाही धडक बसली. त्यामुळे केसरकर यांचा ट्रक मागे जाऊन तिरका फिरला. पुलाच्या मध्यभागी येऊन पुलाचा कठडा या ट्रकने तोडला. ट्रकचा पुढील भाग हा पुलाबाहेर लोम्बकळत होता. सुदैवाने यातील चालक बचावला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. केसरकर यांच्या ट्रकच्या मागून येणाऱ्या इर्टिगा कारलाही (एमएच-08-एजी-2297) या ट्रकची धडक बसून नुकसान झाले. त्यामधील प्रवासी अर्शिया सोहेल मणेर (वय 26, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) ही जखमी झाली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात मारुती पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.