ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

‘बंडखोरी नव्हे, जनादेशाशी गद्दारी’; बंडखोर खासदारांवर सपकाळांचा घणाघात

महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदारांनी मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप; भाजपवरही लोकशाही मूल्ये खच्चीकरणाचा निशाणा

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या खासदारांवर जोरदार टीका केली आहे. ही बंडखोरी केवळ उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेविरुद्ध नसून संपूर्ण महाविकास आघाडी आणि जनतेच्या विश्वासाशी केलेली गद्दारी असल्याचा आरोप त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, संबंधित खासदार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या विजयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली होती. त्यामुळे आता त्यांनी घेतलेली भूमिका ही मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अनादर करणारी आहे. जनतेने महायुतीच्या विरोधात मतदान करून त्यांना संसदेत पाठवले होते. त्यामुळे हा निर्णय म्हणजे जनतेच्या विश्वासाला तडा देणारा असल्याचे त्यांनी म्हटले.

बंडखोर खासदारांवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, जनतेचा विश्वास संपादन करून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी मतदारांच्या अपेक्षांशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. राजकीय स्वार्थासाठी भूमिका बदलणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती वाढत असून लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांवर आघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत पैशाचा वाढता प्रभाव आणि लोकप्रतिनिधींची फोडाफोडी ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात आणि देशात लोकशाही संस्थांची स्वायत्तता टिकवणे आवश्यक असून जनतेनेही अशा घडामोडींवर सजगपणे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!