पंतप्रधानांच्या हस्ते तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण केल्या. तिन्ही युद्धनौकांची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे. मुंबईत आगमन झाल्यावर पंतप्रधानांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
‘आयएनएस वाघशीर’ : पी ७५ स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौकांमुळे भारतीय नौदल अधिक सुसज्ज होणार आहे.
‘आयएनएस सुरत’ : जगातील सर्वांत मोठी युद्धनौका : ‘आयएनएस सुरत’ हे पी१५बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पाचे चौथे आणि शेवटचे जहाज आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक हे जहाज आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे.
‘आयएनएस निलगिरी’ : हे पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे. तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत.
भारत विस्तारवादी नव्हे, विकासवादाने काम करतो – पंतप्रधान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धरतीवर २१ व्या युगात याच नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण मोठं पाऊल उचलत आहोत. ते म्हणजे आपण एकत्रितपणे तीन युद्धनौका नौसेनेत दाखल करत आहोत. आजचा दिवस देशाची सुरक्षा आणि सामर्थ्याला बळ देणारा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एकाच वेळी नौदलात विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुडीचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत हा विस्तारवादी नव्हे विकासवादाने काम करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नौदलाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी या तिन्ही युद्धनौका ‘मेड इन इंडिया’ असल्याचं सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी या युद्धनौका बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्यासह सर्व देशवासियांचं अभिनंदन केलं. आजचा दिवस भारताच्या सागरी वारशासाठी, नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक मोठा दिवस आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, १५ जानेवारी हा भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या प्रत्येक वीराला मी नमन करतो. आपल्या देशाचील नौसेनेचा एक गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौसेनेला नवीन सामर्थ्य आणि नवीन दृष्टीकोन दिला. आज वाघशीर या सहाव्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याचं भाग्य मला मिळालं. नौसेना सशक्त करण्यासाठी आपण मोठं पाऊल उचलत आहोत. भारताने जगाला सागर हा मंत्र दिला. समुद्राला सुरक्षित बनवायचं आहे, त्यादृष्टीनं काम करूया, असं आवाहनही त्यांनी देशवासियांना केलं.
आजचा भारत जगातील एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येत आहे. आज भारताला जागतिक स्तरावर विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जात आहे. भारत विस्तारवादाने नव्हे तर, विकासाच्या भावनेने काम करत असल्याचे सांगत भारताने नेहमीच खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे समर्थन केले आहे, असेही मोदींनी सांगितले. दहशतवाद, हत्यारं आणि ड्रग्ज तस्करी विरोधात भारत खंबीरपणे उभा आहे. इंडो पॅसिफिकमध्ये सहकार्यावर भारताचा भर आहे, समुद्राला सुरक्षित बनविण्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे. कोरोना काळातही भारताने चांगलं काम केलंय.
भारतानं ‘सागर’ हा जगाला मंत्र दिला. वाघशीर या सहाव्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याचं भाग्य मिळालं. जगाचा भारतावरील विश्वास वाढलाय. आपण जगाला वन अर्थ, वन फॅमिलीचा मंत्र दिला. भारतीय नौदल अधिक शक्तिशाली बनत असल्याचेही ते म्हणाले. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक मोठे निर्णय घेऊन झाल्याचा उल्लेख करत देशाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही नवीन कामे सुरू केली आहेत, देशाच्या कानाकोपऱ्याचा विकास होण्यासाठी आम्ही एकत्र पुढे जात असल्याचेही मोदी म्हणाले.




