महाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिली पासून शिकवण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाही-राज ठाकरे कडाडले…

आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही हिंदी लादली तर याद राखा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारला मोठा इशारा दिला आहे. “राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

राज्यातील शाळांमध्ये पहिली ते पाचवी हिंदी भाषा शिकणं अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. संघर्ष झाला तर सरकार त्याला जबाबदार राहील. सरकारनं निर्णय मागे घ्यावा, असे राज ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटलं, मी स्वच्छ शब्दात सांगतो, ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा. त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाषिक परंपराच खिळखिळी – राज ठाकरे पुढे लिहितात की, प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो. परंपरा असते. राज्यातील भाषांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.

स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची- आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, असा राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला.

फोडा आणि राज्य करा- राज्यातील प्रश्नांवरून मनसे अध्यक्षांनी सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी म्हटलं, आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे. सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं सांगूनही कर्जमाफी केलेली नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. उद्योग जगतानं महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.

हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत- हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात. त्यामुळे येथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही. आम्हाला देणंघेणं पण नाही. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत. शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी, असं म्हणत थोडक्यात राज ठाकरे यांनी दुकानदारांनादेखील पुस्तके न विकण्याचा इशारा दिला आहे.

निर्णय मागे घेण्याचे तात्काळ आदेश द्यावेत- प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना? मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल. हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे. त्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे घेण्याचे तात्काळ आदेश द्यावेत, असं आवाहन राज ठाकरे यांनी सरकारला केलं आहे.

पण काळ सोकावतो- माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा. महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील. आज भाषा सक्ती करत आहेत. उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, असे म्हणत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!