मुंबई

उद्या ५ मे रोजी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे दुपारी १२ ते ५ या सत्रात होणार लसीकरण..

पहिल्या मात्रेसाठी नोंदणी बंधनकारक, द्वितीय मात्रेसाठी थेट येण्याचीही मुभा..

मुंबई,दि.४:कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुमारे १ लाख लसींचा साठा आज रात्री उशिरापर्यंत मुंबईत दाखल होणार असून उद्या (दिनांक ५ मे २०२१) रोजी सकाळी हा साठा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील शासकीय व महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.

४५ वर्ष व त्यावरील वयोगटामध्ये पहिली व दुसरी अशी दोन्ही मात्रा (डोस) पात्र नागरिकांना देण्यात येईल. मात्र, यामध्ये पहिली मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना कोविन ऍपमध्ये नोंदणी बंधनकारक, तर दुसऱ्या मात्रेसाठी थेट येण्याचीही (वॉक इन) मुभा देण्यात आली आहे.
पहिली व दुसरी अशा दोन्ही मात्रांसाठी लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र रांग असेल. या वयोगटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करताना ८० टक्के नोंदणीकृत तर २० टक्के थेट येणारे नागरिक यांना सामावून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही विभागणी निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरु असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, उद्या (दिनांक ५ मे २०२१) देखील सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ (slot) दिलेले आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.

या ५ लसीकरण केंद्राची नावे पुढीलप्रमाणे:

१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

उद्याच्या लसीकरण मोहीमेबाबत संबंधित केंद्रांची यादी अद्ययावत करण्याचे काम आज उशिरापर्यंत सुरु असून ही यादी महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवरुन व प्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात येत आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी गर्दी करु नये, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना अवगत करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!