नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात

प्रेस नोट
नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित.

शासकीय वापरापूर्वी स्ट्रक्चरल दुरुस्तीला प्राधान्य – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले.
मुंबई, दि. २ जून २०२६ : मुंबईतील नरिमन पॉईंट या महत्त्वपूर्ण व्यावसायिक परिसरात स्थित ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत आज अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष कार्यक्रमात या इमारतीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूच्या खरेदीस राज्य मंत्रिमंडळाने ८ सप्टेंबर २०२३ रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र शासनाने ‘एअर इंडिया असेट होल्डिंग कॉर्पोरेशन’ (AIAHL) कडून ही इमारत १६०१ कोटी रुपयांना संपादित केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक आर्थिक दायित्वांची पूर्तता केल्यानंतर आज ही वास्तू अधिकृतपणे शासनाच्या मालकीची झाली.
हस्तांतरणानंतर मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत. त्यानंतरच अंतर्गत सजावट आणि इतर पूरक कामांना सुरुवात करावी.
कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन सर्व दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे करण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी दिले. विद्युत यंत्रणा, फिटिंग्ज आणि इतर तांत्रिक सुविधा अत्याधुनिक व उच्च दर्जाच्या असाव्यात, यावरही त्यांनी विशेष भर दिला.
इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे आणि दर्शनी भागाचे महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे सुशोभीकरण करण्यात यावे. यासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद आणि तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्याच्या विविध भागांतून मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता, सुविधा आणि सुलभता हे प्रशासनाचे सर्वोच्च उद्दिष्ट असल्याचे नमूद करत मंत्री भोसले यांनी सर्व कामे निर्धारित कालावधीत आणि उत्कृष्ट दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामांसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या ऐतिहासिक वास्तूमुळे राज्य शासनाच्या विविध कार्यालयांना प्रशस्त, आधुनिक आणि कायमस्वरूपी जागा उपलब्ध होणार असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेतही लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “एअर इंडिया इमारतीचे महाराष्ट्र शासनाकडे झालेले हस्तांतरण हा राज्याच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. गुणवत्तापूर्ण दुरुस्ती, दीर्घकालीन टिकाऊपणा आणि नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य देत या वास्तूचा आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास करण्यात येईल.”




